Pages

Thursday, March 29, 2012

अजिंक्य पारगड

सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेत सर्वात दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला होय. कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रगड तालूका आहे. चंदगड तालुक्यामध्ये पारगड किल्ला मोडतो.
चंदगड या तालुक्याच्या गावापासून साधारण ३० कि.मी. अंतरावर पारगड आहे. पारगड नावाचे गाव किल्ल्यामध्येच वसलेले आहे. पारगडापर्यंत गाडीमार्ग आहे. पारगडापर्यंत चंदगडहून एस.टी. बसची सोय उपलब्ध आहे. ही बस गडाच्या पायर्‍यांपर्यंत जाते. खाजगी वाहन गडाला वळसा घालून गडाच्या माथ्यावर नेता येते.


चंदगडाहून निसर्गरम्य परिसरातून प्रवास करीत आपण तासाभरात पारगडाच्या पायर्‍यांशी पोहोचतो. तिनशे पायर्‍या चढून जाव्या लागतात. यात नव्याने केलेल्या पायर्‍यांबरोबर शिवकालीन पायर्‍याही आपल्याला आढळतात. गडाचा दरवाजा नष्ट झालेला आहे. गडप्रवेश करताच समोर तुटक्या तोफांचे काही तुकडे मांडलेले दिसतात. बाजूलाच हनुमानाच्या मंदिराचा कायापालट करण्याचे काम सुरु आहे. मंदिरासमोर अनामिक असे स्मारक आहे. हे घडीव दगडामध्ये बांधलेले स्मारक कोणातरी महत्वाच्या व्यक्तीचे असावे.

येथून थोडे वर चढल्यावर पारगडावरील वस्ती लागते. दुतर्फा असलेल्या वस्तीमधून रस्ता गेला आहे. या वस्तीमध्येच रस्त्याच्या डाव्या बाजूला शाळा आहे. शाळेच्या आवारातच छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा पण पुर्णाकृती पुतळा चौथर्‍यावर बसविलेला आहे. या पुतळ्याच्या परिसरातच पुर्वी गडावरची सदर होती.

येथून समोरच आपल्याला भवानीमातेचे मंदिर दिसते. या मंदिराचा कायापालटच करण्यात आला आहे. शिवकालीन मंदिर तसेच ठेवून त्याभोवती नविन इमारत उभी करण्यात आली आहे. बांधलेले मंदिर भव्य असून नव्याने शिखर व सभामंडप बांधण्यात आला आहे. मंदिरात भवानीमातेची देखणी मुर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपात शिवकालातील अनेक प्रसंग चितारलेली चित्रे लावली आहेत.


सिहंगड किल्ला माघ वद्य नवमी इ.स. १६७१ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी जिंकला. या वेळी झालेल्या युद्धात तानाजींना मृत्यु पत्करावा लागला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगड किल्ला बांधला व त्याची जबाबदारी किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली. बहुदा हे १६७६ साल असावे. त्यावेळेस काही काळ महाराजांनी या गडावर मुक्काम केला होता. त्यावेळी महाराजांनी किल्लेदार आणि तेथील मावळ्यांना आज्ञा केली की, जो पर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आहेत तो पर्यंत हा गड जागता ठेवा. ही आज्ञा राजाज्ञा होती. गडावरच्या मावळ्यांनी आणि किल्लेदारांनी आजतागायत पारगड जागता ठेवला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचे अकरावे वंशज बाळकृष्ण मालुसरे तसेच शेलार मामांचे वंशज कोंडीबा शेलार आणि त्या काळातील मावळ्यांचे वंशज आजही अनंत अडचणींना तोंड देत गडावर वास्तव्य करुन आहेत.

इ.स. १६८९ मध्ये औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याने पारगड जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्याला या मावळ्यांनी दाद लागू दिली नाही.

पारगड किल्ल्याच्या गडफेरीमध्ये आपल्या दृष्टीला निसर्गाची विविध रूपे, दिसतात. गडावर अनेक तलाव, विहीरी, तटबंदी, स्मारके पहाता येतात. गडावर पोहोचण्यासाठी असलेली सुविधा, निसर्गरम्य परिसर, ऐतिहासीक महत्व, ऐतिहासीक घराणी, जेवणाची व रहाण्याची सोय यामुळे पारगडाला पुन्हा यावेसे वाटले तर नवल नाही. तर मग चला पारगडाला जावूया !

No comments:

Post a Comment