Pages

Thursday, March 29, 2012

कांचनगड

नाशिक जिल्ह्यात दुर्गांची संख्या मोठी आहे. हे दुर्ग गिरीदुर्ग प्रकारात मोडणारे असल्यामुळे बेलाग आहेत. यातील अनेक दुर्ग एकेका डोंगर रांगेमध्ये असल्यामुळे दुर्गांची साखळीच तयार झाली आहे. नाशिक शहराच्या उत्तरेकडे भौगोलिकदृष्टया अतिशय महत्त्वाची अशी अजंठा-सातमाळा ही डोंगररांग आहे. या डोंगर रांगेची सुरवात अचला नावाच्या किल्ल्यापासून होते. या पूर्व-पश्चिम पसरलेल्या रांगेत अनेक दुर्ग ठाण मांडून बसले आहेत.


याच रांगेत माथ्यावर तुरा शोभावा असा सुळका घेवून उभा आहे, तो कांचनगड अथवा कंचना किल्ला. नाशिक-सटाणे मार्ग या सातमाळा रांगेला छेदून जातो. येथे लहानसा घाट रस्ता आहे. या घाटाच्या पश्चिम अंगाला कांचनगड आहे. या घाटाजवळ खेळदरी नावाचे लहानसे खेडे आहे. खेळदरी हे खेडे भाऊ खिंडीच्या दक्षिण पायथ्याशी आहे. नाशिक वडाळाभोई सटाणे अशी एस.टी.ची सेवा आहे. या एस. टी. मार्गाने अथवा चांदवड या तालुक्याच्या गावाकडूनही गाडीमार्गाने खेळदरीपर्यंत पोहोचता येते.


खेळदरीपासून चालत अर्ध्या पाऊण तासात आपण कांचनच्या पायथ्याला पोहोचू शकतो. पायथ्यापासून मळलेल्या वाटेने कांचन मंचनच्या मधील खिंडीत पोहोचेपर्यंत तासभर लागतो. खिंडीच्या उजव्या बाजूच्या गुहेमध्ये पाण्याची टाकी कोरलेली आहेत. खडकांमध्ये कोरलेल्या या टाक्यामधील पाणी थंडगार असून पिण्यायोग्य आहे. या गुहेमधून मंचनचे दृष्यही उत्तम दिसते. खिंडीतून काहीश्या घसार्‍यावरुन कसरत करीत आपण कांचनगडाच्या माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर गडपणाच्या काहीश्या खाणाखुणा सोडल्या तर उभी असलेली एकही वास्तू नाही. पाण्याच्या तीन टाक्या आहेत. माथ्यावरचा सुळका चढण्यासाठी सोबत आवश्यक
असे गिर्यारोहणाचे साहित्य पाहीजे.


कांचनावरुन पूर्वेकडे कोळदेहेर, राजदेहेर इंद्राई हे किल्ले तसेच साडेतीन रोडगा नावाच्या सुळक्याचे दर्शन उत्तम होते. तर पश्चिमेकडे विखार्‍याचा सुळका लक्ष वेधून घेतो. त्याच बरोबर सातमाळा रांगेतील धोडप, खळा-जवळा, सप्तश्रृंगी, अहिवंत हे किल्ले दिसतात. स्वच्छ हवामानात उत्तरेकडे साल्हेर सालोटा, मुल्हेर, चौल्हेर तसेच कर्‍हेगडापर्यंत डोंगररांग दिसते.


कांचनवरुन पुन्हा खिंडीत येवून आपण मंचनावर चढतो. गडाच्या या भागात मात्र आपल्याला अनेक अवशेष व पाण्याची टाकी पहायला मिळतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची संपत्ती लुटल्यानंतर याच मार्गाने परत फिरत असताना मोगली सरदार दाऊदखान आडवा आला होता. या दाऊद खानाला कांचन किल्ल्याच्या जवळ असणार्‍या भाऊड खिंडीजवळ गाठून महाराजांनी त्याचा सपाटून पराभव केला होता. या पराक्रमाची स्मृती जागवीतच आपण कांचनचा किल्ला उतरतो. पायथ्यापासून धोडप गडाकडे जाता येते अथवा खेळदरीकडे येवून परतीच्या वाटेला लागता येते.

No comments:

Post a Comment